गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
गडचिरोली ब्युरो
दिं. ०७ मे २०२५ सगनापूर (ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) –
ढिवर-भोई समाज मंडळ, सगनापूर यांच्या वतीने आयोजित महर्षी वाल्मिकी ऋषी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व ढिवर समाज मंदिर उद्घाटनाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत जेष्ठ नेते मनमोहन बंडावार, भाजपा तालुका महामंत्री संजयजी खेडेकर,अडते संघटनेचे अध्यक्ष योगेश लोडे,भाजपाचे जेष्ठ नेते परशुराम ठाकूर, भोई समाजाचे अध्यक्ष विकास शेंडे, उपाध्यक्ष मुखरेश्वर शेंडे, सचिव रविंद्र शेंडे, बूथ प्रमुख सुभाष चुनारकर, मुखरु झबाडे,रोशन भोयर तसेच अनेक मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन हरिश गेडाम यांनी केले.
कार्यक्रमासाठी मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांचे गावात ढोल-ताशा, फटाके, आणि महिलांनी औक्षण करत केलेले स्वागत हे विशेष आकर्षण ठरले. संपूर्ण गावाने सामूहिक सहभागाने स्वागत यात्रा काढली, ज्यात समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
उद्घाटनप्रसंगी बोलताना मा.खा. डॉ. अशोकजी नेते म्हणाले, “महर्षी वाल्मिकी हे रामायणाचे रचनाकार आणि ढिवर-भोई समाजाचे आराध्य दैवत आहेत. समाजाच्या एकतेचे प्रतीक असलेल्या या मंदिराचे उद्घाटन करण्याचा मला सन्मान लाभला, ही आनंदाची गोष्ट आहे.”
ते पुढे म्हणाले की, “यशवंतराव चव्हाण वसाहत योजनेत 440 घरकुले मंजूर झाली असली, तरी निधी अजून मिळालेला नाही. निधी उपलब्धतेसाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. केंद्र व राज्य सरकार गरीब, वंचित समाजांसाठी कटिबद्ध आहे.”
राम मंदिराचा 500 वर्षांचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी सोडवला याचा उल्लेख करत, विविध लोककल्याणकारी योजनांबद्दलही त्यांनी माहिती दिली. “मी खासदार कार्यकाळात रेल्वे, मेडिकल कॉलेज, गोंडवाना विद्यापीठ, सुरजागड प्रकल्प, कृषी महाविद्यालय, कोटगल व चिचडोह बॅरेज, नॅशनल हायवे, रस्तेची कामे अशी विविध विकासकामे मार्गी लावली आहेत,” असे सांगत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.
मंदिराच्या उभारणीमुळे संपूर्ण ढिवर-भोई समाज एकत्र आला असून, ही एक सामाजिक एकतेची प्रतीकात्मक घटना आहे. या कार्यक्रमाने समाजात नवचैतन्याची लाट निर्माण केली आहे.
Post a Comment