असे पालक आपल्या मुलांचे लग्न जुळू देत नाहीत...

गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा 
लेख 


ही एक नविनच समस्या अनुभवास आली. मुलाचे लग्न जुळावे म्हणुन त्याच्या सावत्र माय ला मंगल परिणय समूहात जोडण्यात आले होते. मुलाचा Biodata अनेक groups मध्ये admins कडून फॉरवर्ड करण्यात आला. Biodata मध्ये संपर्कासाठी सावत्र मायचा नंबर टाकण्यात आला होता. त्या नंबर वर मुलीकडील मंडळींकडून प्रतिसादाचे मेसेज जावू लागले. पण त्यानंतर ग्रुप admin कडे अशा तक्रारी येवू लागल्या की मुलाची आई कुणाला काहीच प्रतिसाद देत नाही. यावरून सावत्र आई ही फक्त दिखावा करीत आहे, हे चाणाक्ष admin च्या लक्षात आले. Admin ने मुलाला या गोष्टीची जाणीव करून दिली व सावध करण्याचा प्रयत्न केला. पण मुलाने दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रुप च्या माध्यमातून त्याचा विवाह जुळू शकला नाही.
मुलाची सावत्र आई असुरक्षिततेच्या विकृत भावनेने मनोविकार ग्रस्त होती. तिचे त्या मुलावर प्रचंड प्रेम! पण *मुलाचे लक्ष कायम माझ्याकडेच राहिले पाहिजे. लग्नानंतर मुलगा आपल्याकडे दुर्लक्ष करेल, तो मला दुरावेल, ती मुलगी उच्च शिक्षित आहे. माझे ऐकणार नाही. मानपान करणार नाही. कदाचित मला हाकलून लावेल, ही काल्पनिक भीती तिच्या मनात होती, म्हणुन ती अशी वागते,* हे मुलाच्या मूळ सख्या नातलगांना माहीत होते. शेवटी नातेवाईकांच्या आग्रही मध्यस्तीमुळे मुलाचे लग्न जुळले. प्रत्यक्ष नातलग एकत्रितपणे नियोजन करीत होते, त्यामुळे इथे मात्र त्या सावत्र आई चा नाईलाज झाला. ती मनातल्या मनात चरफडत होती. तिची अस्वस्थता तिने मनातल्या मनात दाबून धरली.
सगाई ची तारीख ठरली. त्यानंतर कार्यक्रमासाठी दुकानातून अंगठी, कपडे घेतांना ही सावत्र आई वधू पक्षासमोर विचित्र वागली. प्रत्यक्ष सगाई कार्यक्रमामध्ये देखील तिचे वागणे, बोलणे, न बोलणे (जयभीम न घेणे), विनाकारण चिडचिड करणे, भांडण काढणे हे प्रकार अत्यंत असभ्यपणाचे होते. या सर्व प्रकारात नवरा मुलगा मूकपणे वावरत होता. हे सर्व पाहून वधू पक्षाने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. सावत्र आई चे विकृत मन संतुष्ट झाले. वधू च्या व तिच्याकडील मंडळी च्या मनात 'लग्नानंतर संसार टिकेल की नाही? अशा घरात मुलगी देणार कशी?, अशी भावना निर्माण करण्यात ती यशस्वी झाली. विकृती जिंकली आणि लग्न लोंबकळले.
या घटनेतील दुखद बाब म्हणजे मुलगा हा पुर्णपणे आईच्या मुठीत असल्याने वधू पक्षाची समजूत काढण्याचा समाजाचा प्रयत्न निष्फळ आहे. जोपर्यंत सावत्र आई ची मनोचिकित्सा (मानसोपचार) आणि संबंधित मुलाचे विवाहपूर्व समुपदेशन होणार नाही तोपर्यंत त्या मुलाचे लग्न होणे अवघड आहे.
शेवटी जो निर्णय घेण्यात होईल तो स्विकारावाच लागेल. कारण कोणतेही असो आणि तुरळक का असेना पण सगाई नंतर लग्न मोडण्याच्या घटना समोर येतांना दिसतात. एकदा असा डाग लागला तर पुढे लग्न जुळवताना स्पष्टीकरण देतांना मुलाला तसेच मुलीला समस्या जाणवणार नाही, याची खबरदारी जेष्ठ नातेवाइकांनी घ्यायला हवी. समाजाचा विचार करता मुलगा आपला आहे, मुलगीही आपलीच आहे. प्रगल्भ वैचारिक मंडळी दोहोंचे कल्याणच चिंतितात. *वेळ आलीच तर नकार देणारे देखील पुढील पक्षाला त्यांच्यासाठी अनुरूप स्थळ सुचवतील, इतका निकोप समाज आपण चिंतितो.* सगाई/ लग्न तुटले तरी दोन्ही पक्षाकडून त्या मागील कारण असे मांडले जावे की जेणेकरून कुणाकडूनही मुला मुली पैकी कुणाचे चरित्रहनन होणार नाही. यात काही 'मध्यम' निघावे. दुसरे म्हणजे, संबंध विच्छेदाचे कारण पुढे आले की ते मुद्दे लक्षात घेवून पुढील आयुष्यात सुधार करण्याचा/ परिवर्तन करण्याचा, चुका दुरूस्त करण्याचा मार्ग खुला व्हावा. हा कल्याणाचा मार्ग आहे, असे आपण अवश्य मानून चालावे. म्हणुन चुका, त्रुटी, उणिवा मनमोकळेपणाने मांडल्या जाव्यात! या संदर्भात आपापसात सविस्तर चर्चा व्हायला हवी म्हणजे मार्ग निघेल.
तरी देखील या घटनेतून लक्षात घेण्यासारखी काळी बाजू ही की पालक स्थानी असलेल्या काही व्यक्ति अशा विचाराच्या असू शकतात कीv *'कमावता मुलगा/ मुलगी जीवनभर कुवारा/ कुमारीच राहावी, जेणेकरून भविष्यात त्याचा/ तिचा आधार आपल्याला मिळत राहील.'*
बेजबाबदार किंवा दुष्ट पालक प्रमाणात नगण्य असतील तरी समाजचिंतकांना त्यांची दखल घ्यावीच लागेल. फार काय सांगावे? एका सख्ख्या आई बाबत देखील असा अनुभव आला आहे. त्या मातेची मुलगी कमावती आहे. पण ती माता काहीतरी बहाने सांगून, मुलांमध्ये काहीतरी खोट (उणिवा) सांगून एकही स्थळ घरापर्यंत येवू देत नाही. हे अत्यंत खेदजनक, अविश्वसनीय परंतु समाजातील एक कटू वास्तव आहे. कुणाची बदनामी करणे, हा या लेखाचा हेतू नाही. तर विवाहामध्ये अशा समस्या आड येवू नयेत, यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी हे लिहिलेले आहे.

✍️ रविराजे उपाध्ये,
9300443317

0/Post a Comment/Comments